विधिमंडळ कामकाज गांभीर्याने घ्या, नाहीतर…; नाराज देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना म्हणाले….

मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झाले. राज्यभरातील प्रश्न, समस्यांचा उहापोह होऊन सरकारकडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांसाठी तर सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहचविण्यासाठीहक्काचे व्यासपीठ म्हणून विधिमंडळातील कामकाजाकडे पाहिले जाते. त्यामुळेच विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी अधिक असेत. मात्र अलिकडच्या काळात विधिमंडळाच्या कामकाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची, विधिमंडळातील कामकाजाला सरकार गांभीर्याने घेत नसल्याची ओरड विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकार आणि विधिमंडळाच्या कामकाजाबाबत जनतेमध्येही नाराजी पसरू लागली आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मंत्री अनुपस्थित राहिल्यामुळे विधानसभा किंवा विधानपरिषदेचे कामकाज तहकूब करावे लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकवेळा सभागृहात आपल्या खात्याशी सबंधित विषयावर चर्चा सुरु असतानाही मंत्री मात्र आपल्या दालनात बसून बैठका घेत असतात. मंत्र्यांच्या बेफिकीर कारभारामुळे अनेकवेळा कामकाज तहकूब करण्याची आफत पिठासन अधिकाऱ्यांवर ओढवते. काही काही वेळा तर मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे नारा झालेल्या विरोधकांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संसदीय कार्य मंत्र्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागते. विधिमंडळाच्या कामकाजाकडे मंत्र्यांचे होणारे दुर्लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरु लागली आहे. फडणवीस यांनी यापूर्वी अनेकवेळा विधिमंडळ अधिवेशनाला गांभीर्याने घ्या, सभागृहात उपस्थित राहून कामकाज सहभागी व्हा अशा सूचना वारंवार सहकारी मंत्र्याना दिल्या आहेत. मात्र तरीही मंत्र्यांच्या वर्तनुकीमध्ये फरक पडलेला नाही.
हेही वाचा – विधानपरिषदेच्या ११ पैकी तब्बल ‘इतक्या’ जागांवर महायुतीचा विजय; जाणून घ्या संपूर्ण निकाल…
सभागृहातील कामकाजाकडे मंत्र्यांचे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे सरकाची होणारी नामुष्की टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नामी शक्कल काढली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधिमंडळातील कामकाजावरुन मंत्र्यांना मार्गदर्शन केले.
अधिवेशनकाळात सर्व मंत्र्यांनी विधिमंडळात उपस्थित रहावे. दोन्ही सभागृहातील कामकाज दरम्यान कोणत्या मंत्र्यांने कोणत्या सभागृहात उपस्थित रहावे याची माहिती दिली जाईल. त्यानुसार सर्व मंत्र्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. सभागृहातील मंत्र्यांनी अनुपस्थिती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. एखाद्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सदनाचे कामकाज बंद पडल्याची घटना घडली तर ती सहन केली जाणार नाही. मंत्र्यांच्या सभागृहातील उपस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. कामकाज संपल्यानंतर बैठका, ब्रिफींग घ्यावे. मात्र कोणत्याही कारणास्तव किंवा अडचणीमुळे विधिमंडळाच्या कामकाजाकडे आणि सभागृहातील उपस्थितीकडे दुर्लक्ष होणार नाही याची सर्व मंत्र्यांनी खबरादारी घ्यावी. यंदा अधिवेशनाच्या अखेरीस कोणत्या मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे सभागहाचा किती वेळ वाया गेला हे पिठासन अधिकाऱ्यांना जाहीर करण्यास सांगण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला.





