..त्यांच्या निधनाने तो संघर्ष संपला; अंजली दमानिया यांची पोस्ट

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार हे एका खासगी विमानाने मुंबईवरून बारामतीला जाण्यासाठी प्रवास करत होते. यावेळी बारामतीत विमानाचं लँडिंग होत असतानाच विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या निधनावर मनस्वी शोक व्यक्त केला होता. अजित पवार हयात असताना अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात मोठा संघर्ष उभा केला होता. पण आता त्यांच्या निधनानंतर तो संघर्ष संपल्याच्या भावना अंजली दमानिया यांनी व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांच्याविरुद्ध मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ संघर्ष केला. तो वैचारिक आणि तत्त्वांचा लढा होता. काल त्यांच्या निधनाने तो संघर्ष आज संपला आहे. मतभेद तीव्र होते, पण मृत्यूसमोर सर्व वाद थांबतात. आज हा क्षण विचार करण्याचा आहे..लोकशाही, मूल्ये आणि संघर्ष यांचा. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं अंजली दमानियांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : निर्मला सीतारमण देशाच्या पहिल्या अशा महिला अर्थमंत्री..; पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार, नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं बारामतीमधील जनता उपस्थित होती. ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणांमध्ये आपल्या लाडक्या नेत्याला उपस्थितांनी शेवटचा निरोप दिला.




