महाबळेश्वर पर्यटन महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना टोल माफी

सातारा : महाबळेश्वर येथे येत्या २ ते ५ मे दरम्यान आयोजित महापर्यटन महोत्सवास येणाऱ्या पर्यटकांना वाटेतील प्रवेशकर व वाहनतळ आकारणीमध्ये माफी देण्यात आल्याची वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी महाबळेश्वर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून व मंत्री, मदत व पुनर्वसन, मकरंद जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनातून महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या दरम्यान तीन दिवसीय महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा पर्यटन उत्सव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
या महोत्सवाच्या आयोजनाची सध्या जोरात तयारी सुरू आहे. या अंतर्गतच महाबळेश्वर येथील मध संचालनालय सभागृहात आयोजित आढावा बैठकीत कचरे यांनी टोल माफीची माहिती दिली. या वेळी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे हनुमंत हेडे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवास मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावेत यासाठी ही टोल आणि वाहनतळ आकारणी माफी देण्यात आल्याचे कचरे म्हणाले.
हेही वाचा – आपले सरकार पोर्टवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभागप्रमुखांना दरदिवशी 1000 रुपये दंड
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी महाबळेश्वर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ३ मे रोजी महाबळेश्वरच्या साबणे रस्ता येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन भरवले आहे. ज्याद्वारे पर्यटकांना त्याचा आस्वाद घेता येईल. ४ मे रोजी समारोप सोहळ्यापूर्वी लावणी, गोंधळ, जागर, ढोल वादन इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
गुजरातमधील कच्छच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक तंबू उभारण्यात येणार आहेत. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि ‘वॉटर स्पोर्ट्स’चा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद होईल. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे.