पुणे–पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का! निकालानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले..

पुणे | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यातील २९ पैकी जवळपास २५ महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीने विजय मिळवला आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) मोठा धक्का बसला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत आलेल्या अपयशानंतर आणि राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट शेअर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा कौल हा सर्वोच्च असतो आणि आम्ही तो पूर्ण आदरानं स्वीकारतो, तसेच जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमाने काम करत राहू, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल
जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो, असं अजित पवार म्हणाले.
यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर रहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.





