‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे’; अजित पवार यांचं मत

पिंपरी-चिंचवड | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर परखड मत व्यक्त केलं आहे. “महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे,” असं ठामपणे सांगत त्यांनी मराठी भाषेच्या महत्त्वावर जोर दिला. पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि हा दर्जा देण्याचं धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवल्याचा उल्लेख केला.
अजित पवार म्हणाले, की जगामध्ये बहुतांश देशात इंग्रजी भाषा बोलली जाते. भारतात हिंदी भाषा बोलली जाते. ती राष्ट्रभाषा आहे, यावरून अनेक वाद आहेत. मी त्यात जाणार नाही. परंतु, ज्या पद्धतीने बहुतांश देशांमध्ये इंग्रजी बोलली जाते त्याचप्रमाणे तिन्ही भाषा बोलल्या पाहिजेत. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्या मातृभाषेला नंबर एकच स्थान आहे.
हेही वाचा : राज्यातील शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू, महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची
नाशिक येथे झालेल्या दंगली वरून देखील अजित पवारांनी भाष्य केलं. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था महत्त्वाचा आहे. तो कुठल्या राजकीय पक्षाचा, पार्टीचा असला याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेसाठी त्याची खैर केली जाणार नाही, असे अजित पवारांनी नमूद केलं.