‘राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते’; अजित पवारांचा मोठा खुलासा

Ajit Pawar | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वादळ निर्माण झालं. या मुळे या दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली. तेवढ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केली. या राजकीय खेळीमुळे संपूर्ण राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु, शरद पवारांनी या युतीला पाठिंबा न दिल्याने अवघ्या ८० तासांत हे सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. याबात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा खुलासा केला आहे.
अजित पवार म्हणाले, की आमचे वरिष्ठ नेते जसं सांगतात तसं आम्ही करतो. २०१९ च्या घटनेला आता ५ वर्षे झाली. सर्वांना माहितेय कुठे मीटिंग झाली. दिल्लीत कोणत्या उद्योगपतीच्या घरात मीटिंग झाली. पण आता जे झालं ते झालं.
हेही वाचा – ‘चुकीला माफी होऊ शकते, पण गद्दारीला माफी नाही’; खासदार अमोल कोल्हेंची टीका
एनसीपी-भाजपा युतीसाठी पाच बैठका झाल्याचंही बोललं जात आहे. याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, हो. यासाठी पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपात जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरलं होतं. परंतु, त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केलं आहे.
शरद पवारांनी युतीला नकार का दिला? असाही प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, शरद पवारांच्या मनात काय आहे, हे जगात कोणलाच ओळखता येणार नाही. कोणालाच नाही. मलाही नाही. माझी काकीही सांगू शकणार नाही.





