तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर चार पदरी उन्नत मार्ग होणार

पुणे | प्रतिनिधी : औद्योगिक पट्ट्यातून जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) चार पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हे काम खासगीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर करण्याचे नियोजित आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लेखी उत्तरात सांगितले.
हेही वाचा : मेट्रोतून खाली उतरलं की रिक्षा तयार!
भाजपचे विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. टोलमुक्तीनंतर तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघातात होत आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, वाहनचालकांसह रस्त्यालगतच्या स्थानिक गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महामार्गाची दुरवस्था दूर करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली आहे, असे विविध प्रश्न आमदार योगेश टिळेकर यांनी विचारले होते. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लेखी उत्तर दिले आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची देखभाल सन २०१५ ते २०२२ या काळात राष्ट्रीय महामार्गामार्फत करण्यात येत होती. सन २०२२ नंतर भारतीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या करारनाम्यानुसार हा रस्ता ५ डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या ५९ कोटी ७५ लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी, अपघात होत असल्याचे खरे आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग (५४८-डी) हा रस्ता रांजणगाव, चाकण, तळेगाव दाभाडे, मुंबई एमआयडीसीतील प्रवासी, औद्योगिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. सर्व अवजड व स्थानिक वाहतूक या रस्त्यावरुन होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) चार पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हे काम खासगीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर करण्याचे नियोजित आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी सांगितले.





