उद्योगपतींना भीती दाखवून वसुली करण्याची योजना सुरू; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
वाचा :-गृहमंत्री अनिल देशमुख आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
अमृता फडणवीस ट्विट करत म्हणाल्या की, “एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे.’
दुसरीकडे वाझे प्रकरणावरून भाजपानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “चौकशी होऊ द्या मगच वाझेंवर कारवाई करू अशीच तुमची भूमिका होती. अचानक वर्षा या तुमच्या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय खलबंत सुरू झाली आहेत, मुख्यमंत्री साहेब?,” असं म्हणत भाजपाने सध्या सुरू असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकांबद्दल सवाल उपस्थित केला आहे.