इंद्रायणी नदीवरील धोकादायक पूल बंद!
पर्यायी रस्ता वापरण्याच्या सूचना: दुरुस्ती रखडल्याने नागरिक हैराण

पिंपरी-चिंचवड: चऱ्होली ते मरकळ आणि सोळू एमआयडीसी जोडणारा इंद्रायणी नदीवरील श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे पूल धोकादायक झाल्याने दुरुस्तीसाठी बंद केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये बंद झालेल्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दीड महिन्यांपासून काम रखडल्याने छोटे व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय होत असून, अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
चार ते पाच महिन्यांपूर्वी हा पूल धोकादायक घोषित केला होता. डिसेंबर २०२५ मध्ये वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) मार्च २०२६ पर्यंत लोड बेअरिंगचे काम पूर्ण होणार होते. मात्र, दीड महिन्यांपासून दुरुस्ती सुरू झालेली नाही. पूल कमकुवत झाल्याने वाहतुकीस धोका असल्याचे कारण दिले आहे.
हेही वाचा – नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी
वाहतुकीवर परिणाम
या मार्गावरून दररोज ४ ते ५ हजार वाहने ये-जा करत असत. आता ही वाहने शेलपिंपळगाव, निरगुडी, भोसरीमार्गे वळवण्यात आली आहेत. देहू फाटा, आळंकापूर चौक, तापकीर चौक, पांजरपोळ चौक, गोडाऊन चौक, मोशी मार्गे पर्यायी रस्ते वापरण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.
नागरिकांच्या तक्रारी
पूल बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. वाहतूककोंडी वाढल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नगरसेवक नितीन काळजे, सचिन तापकीर, सुनील काटे, संदीप खैरे, सागर दाभाडे यांनी लवकरात लवकर दुरुस्ती सुरू करण्याची मागणी केली आहे. ‘पुलाची दुरुस्ती कधी सुरू होणार आणि नागरिकांची गैरसोय कधी दूर होणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय पाटील यांना संपर्क होऊ शकला नाही.




