मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील ३ तास धोक्याचे! हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ जारी

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या २४ तासांपासून पावसाने रौद्ररूप धारण केले असून राज्यभरात पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. याच दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील ३ तासांत या भागात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह अत्यंत तीव्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ६ जुलैपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. परिस्थिती पाहता, नागरिकांनी अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अशा कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
एमबाप्पेच्या गोलच्या जोरावर फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत; मात्र विजयानंतर मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा
मुंबईत जनजीवन विस्कळीत
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. शहरातील काही रस्ते खचले असून झाडे कोसळण्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. पश्चिम उपनगरात अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोल्टा जंक्शनजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सीप्झच्या गेटसमोर पाणी साचल्यामुळे एमआयडीसी ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जाणारी वाहतूक मंदावली आहे.





