‘मतदान करण्याचा नववर्षात संकल्प करा’; आयुक्त श्रावण हर्डीकर
आकुर्डीतील ‘सखी आंगण’ येथे स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम उत्साहात.

पिंपरी चिंचवड : भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मतदानाचा हक्क केवळ अधिकार नसून तो प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याने लोकशाही अधिक सक्षम होते. २०२६ हे नववर्ष आता सुरू होत आहे. या नववर्षात प्रत्येक निवडणुकीत नियमितपणे मतदान करण्याचा ठाम संकल्प करून याची सुरुवात येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतून करा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले. नागरिकांचा सक्रिय सहभागच सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी लोकशाही घडवू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम शहरातील विविध भागांत राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत आज महापालिकेच्या समाज विकास विभागाने आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेल्या ‘सखी आंगण’ येथे मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला,त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, उपायुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महिला बचत गटांतील महिला यावेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा – ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची ऑनलाईन प्रणाली यशस्वी
मतदानाची शपथ
आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी मतदानाची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महिलांनी आणि युवकांनी पुढाकार घेऊन मतदान केल्यास समाजातील सकारात्मक बदल अधिक वेगाने घडू शकतात. प्रत्येक मत हे लोकशाहीचा पाया मजबूत करणारे असते.
– तृप्ती सांडभोर,अतिरिक्त आयुक्त
सखी आंगणसारखे उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरतात. आर्थिक स्वावलंबनासोबत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला, तर समाज अधिक सक्षम आणि समतोल बनेल. त्यामुळे सखी आंगण येथे घेतलेला मतदान जनजागृती उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे.
-ममता शिंदे,उपायुक्त,




