व्हीजन@फिफ्टी शहर धोरण उपक्रमात गट चर्चेला सुरुवात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेला २०३२ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महानगरपालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध विषय आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांवर महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते, सल्ले, उपाययोजना जाणून घेण्यासाठी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये गटचर्चेचे (फोकस ग्रुप डिस्कशन) आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन पवार, साहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अमित पंडित तसेच विविध विभागांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, आरोग्याधिकारी, कर्मचारी तसेच शहर परिवर्तन कार्यालयाचे सल्लागार उपस्थित होते. व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमाअंतर्गत येत्या ७ वर्षांत महापालिका सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन धोरण विकसित करणे, शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करण्याच्या कामास प्रवृत्त करणे, मुद्दे विकास धोरणात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपूरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे व शहर विकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे आणि महानगरपालिकेचे कामकाज आणखी पारदर्शक होणे, या कामात नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर देणे आदी गोष्टींचा समावेश आहे.
हेही वाचा : शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा दावा
ही सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि कल्याण, तंत्रज्ञान आणि प्रशासन, शहरी पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व विषयांना केंद्रस्थानी ठेवून गटचर्चेमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीच्या आधारे उपस्थितांनी आपली मते किंवा भविष्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना मांडल्या.
सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध भागधारकांनाही व्हिजन@५० शहर धोरण या उपक्रमात सामील करून घेण्यात येणार आहे. यासाठी पुढील ६ आठवडे चालणाऱ्या या गटचर्चेमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार असून अधिकारी, कर्मचाऱ्यासमवेत त्यांनी मांडलेल्या प्रतिक्रिया, सल्ले, उपाय यावरही चर्चा करण्यात येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शहराला केवळ औद्योगिकनगरी म्हणून नाही तर आता स्मार्ट सिटी म्हणूनही ओळखले जाते. महानगरपालिकेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तत्पूर्वी २०३२ पर्यंत व्हिजन@५० या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने काही ध्येय ठरवली आहेत. नागरिकांच्या गरजा समजून घेऊन शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरणार असून शहराचा सर्वांगीण विकास होण्यास यामुळे मदत मिळणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका
व्हिजन @५० शहरी धोरण उपक्रमातून शहरी विकासासाठी आवश्यक उपाययोजनांची नवी दारे उघडण्यास आणि आरोग्य, वैद्यकीय, पर्यावरण, शहरी गतिशीलता, शिक्षण, तंत्रज्ञान या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास साधण्यास मदत मिळणार आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका