भोसरी चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाविरोधात तक्रार

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : भोसरी चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे भोसरी विधानसभा संयोजक आरोग्यमित्र शैलेश स्वामी यांनी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
शैलेश स्वामी यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हंटले आहे कि नुकताच त्यांना भोसरीतील वाहतूककोंडी पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा प्रकर्षाने जाणवला. भोसरी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चौकाच्या चारही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवांतील वाहनांना तासंतास अडकून राहावे लागले. या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीपूर्ती निमित्त ३१ मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील चौकात तैनात असलेले वाहतूक पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपेक्षित प्रयत्न करताना दिसले नाहीत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याऐवजी काही कर्मचारी एका बाजूला निवांत बसून असल्याचे शैलेश स्वामी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत वारंवार विनंती करूनही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी शैलेश स्वामी यांनी पोलीस उपआयुक्त (वाहतूक) यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित वाहतूक पोलिसांच्या कामकाजाची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी भोसरी चौकात कार्यक्षम मनुष्यबळाची नियुक्ती करणे, गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक कर्मचारी तैनात करणे आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
भोसरी चौक हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा चौक मानला जातो. औद्योगिक क्षेत्र, निवासी भाग तसेच पुणे-नाशिक महामार्गाशी जोडला गेलेला हा चौक असल्याने दररोज हजारो वाहनांची ये-जा येथे होत असते. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी अधिक दक्षता आणि जबाबदारीची आवश्यकता आहे पण दुर्दैवाने पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दररोज हजारो नागरीकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होतो त्याबाबत पोलीस उपायुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे, त्याचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
– शैलेश स्वामी, पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा





