breaking-newsताज्या घडामोडी

रत्नागिरी रिफायनरीसमोर पुन्हा पेच; ३ गावांनी विरोधाचे ठराव मंजूर केले

रत्नागिरी – रत्नागिरी रिफायनरीच्या मार्गातील अडथळ्यांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाही. नवीन ठिकाणी या रिफायनरीसाठी जागेचा शोध सुरू असतानाच त्या परिसरातील ३ गावांनी रिफायनरीला विरोध करून तसे ठराव या गावांच्या ग्रामपंचायतींनी मंजूर केले आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव येथे एमआयडीसीच्या जागेवर रिफायनरी व्हावी, अशी मागणी आहे. देवाचे गोठणे, शिवणे आणि गोवळ या गावांमधील जागाही या रिफायनरीसाठी घेतली जाणार आहे. याला ३ गावांनी विरोध केला आहे. यामुळे रत्नागिरी रिफायनरीच्या मार्गात पुन्हा पेच निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रिफायनरी होणारच, असा दावा केला आहे. त्यामुळे रिफायनरीच्या घडामोडींना वेग आणि महत्त्व आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधून हा प्रकल्प व्हावा असा सूर निघत आहे. या प्रकल्पाला पाठिंबा देणारी पत्रे आणि निवेदने दिली जात आहेत. मात्र या प्रकल्पांमध्ये स्थानिकांच्या जमिनी जाणार आहेत. तेव्हा त्यांचे मत सगळ्यात महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत देवाचे गोठणे, शिवणे आणि गोवळ या ३ गावांच्या ग्रामपंचायतींनी फेब्रुवारी २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत रिफायनरीच्या विरोधात ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत संमत केले आहेत. बारसूसह इतर २ ग्रामपंचायतींनी असेच ठराव संमत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बारसू-सोलगावच्या ग्रामस्थांनी रिफायनरीच्या विरोधात संघटना स्थापन केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी रिफायनरीला विरोध वाढत असल्याचे चित्र आहे. या नवीन जागेत राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द आणि धाऊलवल्ली या गावांतील जमीन जाणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी ३० जूनला बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे रिफायनरीवरून कोकणातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button