PCMC : कोरोनाविरुध्दच्या लढाईत सीमा सावळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी!
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. पण मजूरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. सोशल डिस्टनसिंगची काळजी घेत भाजपाच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी संपूर्ण बालाजीनगर परिसरात घरोघरी सुमारे २० टन धान्याचे वाटप केले.
कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आले आहे व त्याचा वाढता संसर्ग रोखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बालाजीनगरमधये हातावर पोट असणऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. घरातील राशन अल्प असल्यामुळे या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे . परंतु, अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. बालाजीनगर माझ्या कुटुंबासारखेच आहे व त्यामुळे अन्नधान्याचे वाटप केले, अशी माहिती सावळे यांनी दिली.
अन्न-धान्याचा पुरवठा नियमितपणे होणार असला तरी, तो खरेदी करण्यासाठी कष्टकऱ्यांच्या घरात पैसेच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. संकटाच्या या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी यथा शक्ती मदत करावी, असे आवाहन सावळे यांनी केले आहे.