राज्यात पुढचे २ दिवस ऑरेंज अलर्ट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. अशातच आता राज्यात २ दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार २५ एप्रिलला बीड, धाराशीव, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. तर २६ एप्रिलला पुणे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीएड, नांदेड, परभणी, बुलढाणा, वाशीम, अमरावती येथे गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. यामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती आहे. दक्षिण तामिळनाडू आणि परिसरावर ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे मध्य प्रदेशपासून, महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे.