breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

“विरोधकांना स्वप्नातही एकनाथ शिंदेच दिसतात ः श्रीकांत शिंदेंची ठाण्यात टोलेबाजी!

ठाणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट, शिवसेना विरुद्ध भाजपा, काँग्रेस विरुद्ध भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असे अनेक पदर या संघर्षाचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी टोलेबाजी केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या ठाणे-कल्याणच्या दौऱ्यावर असून त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

शनिवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते देशाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांचा सत्कार करण्यात आला. यावर विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सरन्यायाधीशांनी या प्रकरणातील एका पक्षासोबत कार्यक्रमात हजेरी लावणं चुकीचं असल्याची टीका केली जात आहे.

“विरोधकांना दुसरं कामच उरलं नाहीये”
यावरून विरोधक टीका करत असल्याबाबत विचारणा होताच श्रीकांत शिंदे यांनी खोचक टिप्पणी केली आहे. “राज्यात हे बहुमताचं सरकार आलं आहे. त्यामुळे विरोधकांना आता करायला इतर कुठल्या गोष्टी उरल्याच नाहीयेत. आता एकनाथ शिंदे ज्या गोष्टी करतील त्याच्यावर टीका करणं हेच काम त्यांना राहिलंय”, असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

“पूरी पिक्चर अभी बाकी है”
“विरोधकांना आता पूर्णवेळ एकनाथ शिंदेच दिसतात. स्वप्नातही त्यांच्या एकनाथ शिंदेच येतात. गणेशोत्सवात एकनाथ शिंदे फिरले. त्यासोबत शासकीय कामकाज, सरकारी निर्णय घेण्याचंही काम त्यांनी केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसं करू शकतो? हे विरोधकांच्या डोळ्यांत खुपायला सुरुवात झाली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. ये तो केवल झाँकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है”, असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान, अनुराग ठाकूर यांचं मोदक देऊन स्वागत केल्याचं सांगत श्रीकांत शिंदेंनी करोना काळातील तत्कालीन ठाकरे सरकारच्या कारभारावर तोंडसुख घेतलं. “गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्र पिछाडीवर पडला होता. आज महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम शिंदे सरकारच्या माध्यमातून होत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव धूमधडाक्यात लोकांनी साजरा केला. कोणतेही निर्बंध या उत्सवांवर नव्हते. जेव्हा जेव्हा उत्सव आले, तेव्हा तेव्हा निर्बंध लादण्याचं काम आधीच्या सरकारने केलं. ते सर्व निर्बंध काढण्याचं काम या सरकारने केलं आहे. त्यामुळे या सरकारबाबत लोकांचा उत्साह दिसून येत आहे”, असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button