नवज्योत सिंह सिद्धू यांची तुरूंगातून सुटका; ४८ दिवसआधीच तुरूंगाबाहेर
२० मे २०२२ पासून सिद्धू तुरूंगात शिक्षा भोगत होते
Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांची आज (1 एप्रिल) तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. १९८८ च्या रोड रेज प्रकरणी सिद्धू शिक्षा भोगत होते, पण ४८ दिवस आधीच ते तुरूंगाबाहेर आले आहेत. ते २० मे २०२२ पासून सिद्धू तुरूंगात शिक्षा भोगत होते.
तीन दशक जुन्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर सुमारे १० महिन्यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पतियाळा तुरुंगातून सुटका करण्यात आली.
या देशात जेव्हा जेव्हा हुकूमशाही आली तेव्हा क्रांतीही आली आणि यावेळी त्या क्रांतीचे नाव आहे राहुल गांधी. तो सरकारला खडसावेल, असं नवज्योत सिंह सिद्धू म्हणाले.
नेमकं प्रकरण काय आहे?
२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून १.५ किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंहला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणात सिद्धू यांची ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. पण हायकोर्टाने सिद्धू यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सिद्धू यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. १५ मे २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु मे २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना सिद्धू यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.