महाविकास आघाडीची भाजपावर आगपाखड अन् खासदार कोल्हेंची ‘कौतुकाची फुंकर’
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हेंकडून मोदी-फडणवीसांचे ‘गुणगाण’
रांजणगावच्या प्रकल्पामुळे रोजगारच्या संधी निर्माण होतील
पिंपरी : राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपा+ बाळासाहेबांची शिवसेना सरकारवर प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याबाबत आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी सुरू आहेत. याबाबत महाविकास आघाडीचे भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लक्ष्य’ केले आहे. याबाबत परकीय गुंतवणूक आणि प्रकल्पांबाबत ‘नॅरेटिव्ह सेट’ केले जात आहे, असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढाई सुरू असताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतूक केले आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजरी देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात 2000 कोटींची गुंतवणुक आणि सुमारे 5000 रोजगार निर्माण होणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येईल. तसेच, सी-डॅक सेमी कंटक्टर प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियासह पत्रकार परिषद घेवून केंद्र सरकारचे आभार मानले.
दरम्यान, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीसुद्धा केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील रांजणगावमध्ये होणार असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर बद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार! या प्रकल्पाचा सूतोवाच तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केला होता. देवेंद्रजी,तरुणांना रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाला लवकरात लवकर मूर्त स्वरूप यावे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांप्रमाणे तुम्हीही पाठपुरावा करावा,ही विनंती!जेणेकरून या परिसरातील उद्योग-व्यवसायांना आणखी चालना मिळेल!, असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी केले.
खासदारांकडून कौतूक अन् पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन…
महाराष्ट्रात येणारे प्रस्तावित प्रकल्प गुजरातला पळवण्याचा घाट घातला जात आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचा महाराष्ट्राची वाट लावत आहे का? असा सवाल उपस्थित करीत सोमवारी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ हजार जाब पत्रे पाठवण्यात आली. यासह पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान आणि राज्यातील मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर कडवट टीका करीत लक्ष वेधले. मात्र, त्याच दिवशी स्व-पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रांजणगाव येथे होणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतूक केले. एका बाजुला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी बेरोजगारीवरुन भाजपाला लक्ष्य केले आणि दुसरीकडे रांजणगावमध्ये येणाऱ्या प्रकल्पामुळे रोजगार संधी उपलब्ध होतील, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्याच खासदारांनी भाजपाचे गुणगाण गायले. त्यामुळे डॉ. कोल्हेंचा ओढा भाजपाकडे वाढला आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.