काँग्रेस आमदाराला पोलिसांनी घरात जाऊन ठोकल्या बेड्या; पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावताच कारवाई
आसाम |
राज्यात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या हटाव मोहिमेत झालेल्या हिंसाचारावर भाष्य करताना आसामचे काँग्रेस आमदार शर्मन अली अहमद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शर्मन अली अहमद यांनी माथी भडकावणारं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. तीन वेळा आमदार राहिलेल्या शर्मन अली अहमद यांना काँग्रेस पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेड्या ठोकण्यात आल्या. शर्मन अली अहमद यांनी दरांग जिल्ह्यात ४० वर्षांपूर्वी झालेल्या हत्या योग असल्याचं म्हटलं होतं. याच ठिकाणी गेल्या आठवड्यात हटाव मोहिम पार पडली होती. हत्या झालेल्यांना शहीद म्हणून संबोधलं जात असताना शर्मन अली अहमद यांनी त्यांता हत्यारे असा उल्लेख करत वाद निर्माण केला होता.
१९८३ च्या आसाम आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीचा अतिक्रमण कऱणाऱ्यांकडून अनादर केलं जात असल्याच्या वृत्तावर बोलताना शर्मन अली अहमद यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता, तसंच अनेक एफआयआर पण दाखल झाले होते. काँग्रेसने शर्मन अली अहमद यांना कारणे दाखवा नोटीस बजावताना राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला आहे. तसंच राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला. २० सप्टेंबरला दरांग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सिपाझारपासून नऊ किमी अंतरावर असणाऱ्या धौलपूरमधील चार ठिकाणी हटाव मोहीम सुरु केली होती. यावेळी सरकारी मालकी असल्याचा दावा असणाऱ्या जमिनीवरुन ८०० कुटुंबाना हटवण्यात आलं. यामध्ये बंगाली भाषिक मुस्लिमांची संख्या जास्त होती. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हिंसाचार उसळला. यावेळी पोलसांनी केलेल्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाला. तसंच पोलिसांसहित अनेकजण जखमी झाले.