मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या कारला भीषण आग
चालक गंभीर भाजला; काही काळ वाहतूक ठप्प

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खेड तालुक्यातील भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चालक गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – MIT Arts, Commerce and Science College, Alandi येथे ‘सायबर जनजागृती दीपोत्सव’
इंजिनमधून धूर; काही क्षणांत कार जळून खाक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडहून चिपळूणकडे जाणारी Maruti WagonR ही कार अचानक बिघाडामुळे पेटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंजिनमधून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच वाहनाने भीषण आग पकडली. काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण कारला वेढा घातला आणि अवघ्या काही मिनिटांत वाहन पूर्णतः जळून खाक झाले.
प्रसंगावधानामुळे जीव वाचला
चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ जळत्या कारमधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र या प्रयत्नात तो गंभीर भाजला. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अग्निशमन दलाचे प्रयत्न; वाहतूक विस्कळीत
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि खेड नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत कार पूर्णतः जळून गेली होती.
आगीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने उपाययोजना करत वाहतूक सुरळीत केली.
आगीचे कारण अस्पष्ट; तपास सुरू
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




