‘भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत’ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक
मुंबई : नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? अशी चर्चाही रंगू लागली आहे. यावर बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, त्यामुळे या चर्चांमध्ये अर्थ नाही, असा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.
देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. काल पंतप्रधान मोदी यांनी चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाविषयी चर्चा केली होती. या बैठकीत राष्ट्रीय धोरण आखवं अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या मुद्दयावर चर्चा मोदी-पवार भेटीत चर्चा झाली तसंच लसींअभावी लसीकरणात अडथळा येत आहे. त्यामुळे लस पुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणीही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
रेग्युलेटरी अॅक्टमध्ये जे बदल करण्यात आले आहेत ते बँकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे सहकारी बँक ही एखाद्या धनाढ्य माणसाच्या ताब्यातही जाऊ शकते. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. या बदलांमुळे काय घडू शकतं याचं एक लेखी पत्रच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.





