मुंबई पालिकेची निवडणूक लांबणीवर ; नगरसेवकांना मुदतवाढ की प्रशासकाची राजवट ?
मुंबई | इतर मागासवर्ग आरक्षणाचा (ओबीसी) तिढा सुटेपर्यंत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने प्रभागांच्या भौगोलिक सीमा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेला केली आहे. २ मार्चपर्यंत प्रभाग रचनेवर विवरणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आल्याने प्रत्यक्ष निवडणुका या एप्रिल किंवा त्यानंतरच होतील, अशी चिन्हे आहेत. परिणामी, मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या विद्यमान नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार की महापालिकेवर प्रशासकाची राजवट येणार हा निर्णय महत्त्वाचा असेल.
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नव्या नगरसेवकांची निवड होणे आवश्यक असते. त्याकरिता पालिकेची निवडणुक साधारण:त फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित होते. प्रभागांची वाढलेली संख्या आणि ओबीसी आरक्षणाच्या तिढय़ामुळे महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. विद्यमान नगरसेवकांची मुदत संपेपर्यंत महानगरपालिकेची निवडणूक होणार नाही हे आता स्पष्ट झाले. परिणामी, विद्यमान नगरसेवकांना मुदतवाढ किंवा प्रशासकाची नियुक्ती पालिकेवर करावी लागेल. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारला नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाबाबत असलेली आकडेवारी मागासवर्ग आयोगास सादर करावी लागणार आहे. त्यानंतर आयोगाने ही आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्यास व निवडणूक आयोगास कराव्यात असे आदेश दिले आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूकीचे कामकाज वेळेत पार पाडावे याकरिता प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा पूर्ण करण्याकरिता आयोगाने या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.