राज्यात २७,९७१ नवे करोना रुग्ण
मुंबई | राज्यात दिवसभरात करोनाच्या २७,९७१ नवीन रुग्णांची नोंद झाली व ६१ रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ५०,१४२ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,४४,३४४ इतकी झाली आहे.राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ८५ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ३१२५ झाली आहे. त्यापैकी १६७४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ठाणे शहर २७४, कल्याण-डोंबिवली १५०, नवी मुंबई ५६७, पनवेल १७ २, रायगड २९८, नाशिक १४११, नगर ६१८, जळगाव २४१, पुणे १६३६, पुणे शहर ५३८६, पिंपरी-चिंचवड २४९२, सोलापूर ४७२, सातारा १०२०, नागपूर २०६० इतकी नवीन रुग्णांची नोंद झाली.
मुंबईतील रुग्णसंख्या वेगाने कमी होत असून शनिवारी १,४११ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एका दिवसात दुपटीहून अधिक म्हणजेच ३ हजारांच्या आसपास रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या केवळ १२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. मृतांची संख्या मात्र वाढली असून शनिवारी दिवसभरात ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी होत ३.६ टक्के झाले आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ८७ टक्के म्हणजेच १,२२७ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.