‘राष्ट्रगौरव’ पुरस्कारामुळे देशासाठी काम करण्याची प्रेरणा: महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती
पिंपरी : हिंदवी स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून दिली. ही संकल्पना सर्वांनी पुढे घेऊन जावे. शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांना जाती-पातीत बांधू नये. लालबाबू गुप्ता यांची विश्व मैत्री पुरस्काराची संकल्पना मोठी व्यापक आहे. हा पुरस्कार प्रेरणादायी आहे. या पुरस्कारातून आदिवासी, दलितांसाठी काम करण्याची मोठी प्रेरणा मिळाली असल्याचे इंदौर वृदांवनातील 1008 महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.
विश्व मैत्री संघाच्या वतीने स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते ‘राष्ट्रगौरव 2021-22 या’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अतिशय देशभक्तीपर आणि उत्साहाच्या वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात रविवारी (दि. 27) रोजी झालेल्या कार्यक्रमाला विश्व मैत्री संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रियंका गुप्ता, संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता, श्यामजी महाराज, माजी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, गोदावरी विद्यालयाच्या प्राचार्या कुसुम तिवारी, अंबिकालाल गुप्ता, बिंदू तिवारी, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, नीता पाडाळे, प्रमोद गुप्ता आदी उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
इंदौर वृदांवनातील 1008 महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती म्हणाले, “देशाची आझादी समृद्ध, सुदृढ व्हावी. सनातन धर्म आणि या धर्माला मानणारे लोक शक्तिशाली, विद्वान, बुद्धिमानी आहेत. पण, विविध जातीत विभागाले असून सर्वांना एकत्र आणून काम केल्यास राष्ट्र वेगाने पुढे जाईल. आदिवासी लोकांमध्ये आपला हिंदू धर्म असल्याचा स्वाभिमान निर्माण झाला आहे. त्याप्रमाणे सर्वांमध्ये हिंदू धर्माबाबत स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला विश्व मैत्री संघ पुढे नेत आहे. लालबाबू गुप्ता यांची राष्ट्राप्रती विराट भावना आहे”.
त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राचे डॉ. नितीन मोरे म्हणाले, “देशासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा विश्व मैत्री संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. साडेसात हजार स्वामी केंद्रांच्या माध्यमातून आम्ही देशभरात विविध उपक्रम राबवित आहोत. आमच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याबद्दल मी लालबाबू गुप्ता यांचे आभार मानतो. हा पुरस्कार प्रेरणादाई आहे. या पुरस्कारातून सेवा मार्गासाठी प्रेरणा मिळत राहणार आहे”.
माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील म्हणाले, “विश्वाचा विचार करून मैत्री संघाची स्थापना केली. विविध क्षेत्रातील नामवंताना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त लालबाबू गुप्ता यांचे मी आभार मानतो”. राष्ट्रीय भटके-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशात येणाऱ्या विविध राष्ट्राच्या प्रमुखांचा भगवतगीता देऊन सत्कार करतात. भेट देण्यासाठी भगवतगीते सारखी मौल्यवान वस्तू कोणतीही नाही. क्रांतिकारांनी राष्ट्रासाठी प्राण दिले. राष्ट्रगौरव नावाच्या पुरस्कारामागे देशभक्तीची मोठी संकल्पना आहे. राष्ट्रासाठी काम करणाऱ्यांना राष्ट्रगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. कौतुकास्पद हा उपक्रम आहे”.