‘मिशन वात्सल्य’ अभियान अपयशी; करोना एकल महिला पुनर्वसन समिती
पुणे : करोनाच्या काळात पती गमावलेल्या महिलांसाठी सुरू केलेल्या ‘मिशन वात्सल्य’ अभियानाच्या गेल्या सात महिन्यांत पाचही बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे हे अभियान अपयशी ठरले आहे, असा आरोप ‘करोना एकल महिला पुनर्वसन समिती’ने केला आहे. करोनाकाळात पती गमावलेल्या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजना सुरू केली. २७ ऑगस्टला सुरू झालेल्या योजनेला रविवारी सात महिने पूर्ण झाले. या सात महिन्यांत ही योजना अपयशी ठरली आहे, असा आरोप ‘करोना एकल महिला पुनर्वसन समिती’ने केला आहे. तरीही हे अभियान अतिशय चांगले काम करीत आहे, अशी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधीमंडळात दिलेली माहिती दिशाभूल करणारी, चुकीची आणि संतापजनक आहे, असेही म्हटले आहे. ‘मिशन वात्सल्या’च्या आठवड्याला एक याप्रमाणे महिन्याला चार बैठका होणे अपेक्षित आहे. पण, गेल्या सहा महिन्यांत २८ बैठका सोडाच; पण पाच बैठकाही न झालेले अनेक तालुके आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. एकल महिला पुनर्वसन समितीने वेगवेगळ्या तालुक्यात किती बैठका झाल्या, ही माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अतिशय निराशाजनक चित्र असल्याचे आढळले. अनेक ठिकाणी स्थापनेच्या बैठका झाल्यानंतर समितीच्या जिथे कार्यकर्त्यांनी आग्रह धरला तेथे काही बैठका घेण्यात आल्या. समितीचे कार्यकर्ते जेथे सक्रिय नाहीत, तेथे तर अधिक निराशाजनक स्थिती आहे; कारण विचारणारे कोणीच नाही, असेही समितीने म्हटले आहे.