पंतप्रधान मोदींसोबत आज काश्मिरी नेत्यांची बैठक; जम्मू-काश्मीरमध्येअलर्ट जारी
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच जम्मू-काश्मीरच्या ८ राजकीय पक्षांच्या १४ लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीस एकूण १४ प्रतिनिधींना बोलविण्यात आले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद, गुलाम अहमद मीर, ताराचंद, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, भाजपाचे निर्मल सिंग, कवींदर गुप्ता आणि रवींद्र रैना, पीपल्स कॉन्फरन्सचे मुझफ्फर बेग आणि सज्जाद लोणे, पँथर्स पार्टीचे भीम सिंग, सीपीआयएमचे एमवाय वाय. आणि जेके अपनी पक्षाचे अल्ताफ बुखारी यांना बैठकीस आमंत्रित केले आहे.
दरम्यान, कलम ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच जम्मू-काश्मीरसंदर्भात राज्यातील पक्षांसह केंद्र सरकारकडून राजकीय पुढाकार घेण्यात येत आहे. परंतु बैठकीबाबत निश्चित अजेंडा अद्याप समोर आलेला नाही.