‘बिनकामाचे कळप एकत्र येत आहेत’; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे. आज त्यांची सांगलीमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक महत्वाचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगायचं आहे की एकत्र या, एकजूट दाखवा. ज्या मराठा बांधवांना आरक्षण असेल त्यांनी एकत्र या आणि नाही त्यांनीही एकत्र यावं. आता बिनकामाचे कळप एकत्र येत आहेत, मात्र तुमचा मराठा बांधव इथे उभा आहे. मराठा समाजाच्या लोकांना जात वाचवणं गरजेचं आहे. उद्यापासून एकजूट दाखवा ही तुम्हाला मी तुमचा मुलगा म्हणून विनंती करतो. आपल्याला आव्हान पेलायचं आहे, आपल्या लेकराच्या हितासाठी आपल्याला हे करावंच लागेल. आत्ता आपण त्याचीच तयारी करायची आहे. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये.
हेही वाचा – ओबीसी सभेतून छगन भुजबळांचा जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले..
जातीवर रचलेलं षडयंत्र, चारही बाजूने टाकलेला वेढा हे सगळं उधळण्याचं काम मराठा समाजाचंच आहे. ७० वर्षांपासूनचे पुरावे मिळाले आहेत. समितीने पुरावे शोधायला सुरुवात केली. मराठा ५० टक्क्याच्या आत आहे, मराठा ओबीसीच्या आरक्षणात आहे हे सिद्ध झालं आहे. मराठ्यांनी ओबीसी आरक्षणात येण्यासाठी सगळे निकष पूर्ण केले आहेत. आपली जात संपवण्यासाठी चारही बाजूने प्रयत्न होत आहेत. हा वेढा आपल्याला उठवायचा आहे, त्यासाठी आपली एकजूट दाखवून देऊ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
एकही राजकारणी आपल्याला मदत करणार नाही, कुणीही राजकीय नेता आपल्या मदतीला येणार नाही. तुम्ही त्यांना साहेब म्हणता, साहेबांना मोठं केलं, त्याच्या वडिलांना मोठं केलं. मात्र ते आपल्याला मदत करायला येणार नाही. प्रत्येक पक्षाला मराठ्यांनी मोठं केलं. सगळ्यांनाच मोठं व्हायला मदत केली. त्या नेत्यांना आपण मोठं केलं कारण आपल्या बापजाद्यांना वाटलं होतं की हा माणूस मोठा झाला की आपल्या लेकराबाळांना मदत करेल. मात्र एकही राजकीय नेता आपल्याला मदत करत नाही. त्यामुळे आपण त्याला मोठं केलं कशाला? असा सवालही जरांगे पाटलांनी यावेळी उपस्थित केला.