‘..तर मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलं नसतं’; मनोज जरांगे पाटील यांचं विधान
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, परवा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण पंतप्रधानांना या दोघांनी मराठा आरक्षणाबाबत व त्यासाठीच्या आंदोलनाबाबत सांगितलं नाही अशी शंका आहे. जर त्यांनी सांगितलं असेल, तर पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का? पंतप्रधानांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा अर्थ महाराष्ट्रातील जनता आता काढायला लागली आहे.
हेही वाचा – गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार!
पंतप्रधान बोलले काय किंवा नाही बोलले काय, मराठ्यांना काही फरक पडत नाही. पण समाज शांत यासाठी होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील असं समाजाला वाटलं होतं.मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी लावण्याबाबत सांगतील असं वाटलं होतं. पंतप्रधानांच्या बाबतीत मराठ्यांच्या मनात वैरभावना नव्हती. जर तशी असती, तर पंतप्रधानांचं विमानही शिर्डीत खाली उतरू दिलं नसतं. ते वरचेवरच परत पाठवलं असतं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आता गोरगरीबांची गरज पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना गोरगरीबांची गरज राहिली नाही असा संदेश महाराष्ट्र व देशभरात गेला आहेत. त्यांनी आमच्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. मराठ्यांनी त्यांना ४० दिवसांचा वेळ घेतला होता. पण आरक्षण दिलं नाही. याचा अर्थ सरकारसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये हे षडयंत्र रचलं होतं. तुम्ही मराठ्यांचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला पाहिजे यासाठीच तुम्ही आरक्षण देत नाही आहात. सगळ्या गोष्टी तुमच्या अंगलट आल्या आहेत. पुरावे मिळूनही आरक्षण देत नाही, त्यामुळे तेही तुमच्या अंगलट आलंय. तुम्हाला नाक नसल्यासारखं झालंय. तुम्ही मागाल ते मराठ्यांनी दिलं आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.