मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला नवं आवाहन; म्हणाले..
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गाव बंदी करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपुर्वी केलं आहे. मात्र, आता दिवाळीत देखील राजकीय नेत्यांबाबत त्यांनी एक महत्वाचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, १ डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरु करा. मराठा तरुणांनी दुसऱ्या गावात जाऊन साखळी उपोषणाबद्दल जनजागृती करावी. राजकीय नेते दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे या कार्यक्रमांना मराठा समाजातील लोकं जात असतील, तर त्यांनी या नेत्यांकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा. फराळापेक्षा आपल्या लेकराच भविष्य महत्वाच आहे. आधी जातीला माना, नंतर नेत्यांना माना. तुम्ही मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा असे सर्वात आधी या नेत्यांना सांगा.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘आयएसडीएस’’ च्या कामाला चालना!
कोण-कोणासाठी काय करतयस हे सगळ्यांना माहितीय. ओबीसीं बांधव आमच्या सोबत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. राजघराण्यांनी, संस्थानिकांनी त्यांची दप्तर, त्यांच्याकडच्या नोंदी सरकारी अभ्यासकांना उपलब्ध करुन द्याव्यात, त्यामुळे गोरगरीबांच कल्याण होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.