‘शिंदे साहेब, उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका’; मनोज जरांगे पाटीलांची विनंती
मुंबई | मराठा समाजाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सुधारित राजपत्र मनोज जरांगे पाटलांना सुपूर्द केलं असून त्यांचं उपोषणही सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटलांनी विजयाचा गुलाल लावला. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू होता. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या परिवारातील लोकांनाही तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावं. ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगेसोयऱ्यांनासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी आपण येथे आलो होतो. साडेचार महिन्यांपासून आपण संघर्ष केला आहे. आपल्याला न्याय मिळावा आणि सगेसोयरेही आरक्षणात यावे याकरता अध्यादेश येणं गरजेचं होतं. माझ्या मायबाप मराठ्यांनी या आरक्षणासाठी संघर्ष केला आहे. ३०० पेक्षा जास्त मराठ्यांच्या पोरांनी बलिदान दिलं आहे. माता-माऊलीच्या कपाळी कुंकू राहिलं नाही. घरातील कर्ता पुरूष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं.
हेही वाचा – ‘मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले’; हरिभाऊ राठोड यांचं विधान चर्चेत
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं याकरता मुख्यमंत्र्यांनी शिबिरे सुरू केली. वंशावळी जुळवण्याकरता समिती स्थापन केली. नोंदी सापडलेल्या कुणबी प्रमाणपत्रधारकांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यात येईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगेसोयरे”, असं म्हणत सगेसोयऱ्यांसाठी राजपत्रक काढल्यामुळे मनोज जरांगेंनी सरकारचे आभार मानले. “मराठ्यांची लेकरं रस्त्यावर झोपले, कधी अन्न मिळालं नाही, पाणी मिळालं नाही. पण एकानेही माझ्यापर्यंत तक्रार आणली नाही. प्रत्येक संघर्षाला तोंड दिलं. तुमची झालेली महाराष्ट्रातील एकी आणि तुमचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी एकच विनंती आहे की, तुम्ही अध्यादेश दिला. त्यासाठी गुलाल उधळला. पण या उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.