कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
पुणे । प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. राष्ट्रवादीने भाजपची सत्ता उलथवून टाकली आहे. सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीच्या 15 पैकी 11 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहे.
दुसरीकडे, राज्यातील अनेक ठिकाणी भाजप पुरस्कृत गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत सर्व 9 जागा जिंकल्या आहे.
दक्षिण सोलापुरातील घोडा तांडा ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. एकूण 9 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. 9 पैकी 9 जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे फुलसिंग लालू चव्हाण यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर विद्यमान सरपंच चंद्रकांत चव्हाण यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
तर दुसरीकडे अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर झाले आहे. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना इथं मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकत परिवर्तन पॅनलने विजय मिळवला आहे. तब्बल 20 वर्षानंतर लोणी खुर्द गावात सत्तांतर झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पण, स्थानिक असलेल्या परिवर्तन पॅनलने विखे पाटलांना जोरदार धक्का दिला आहे.
तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या खानापूरमध्ये 9 जागा पैकी पहिल्या 3 जागा शिवसेनेने जिंकल्या आहे.
तर सोलापूर जिल्ह्यात होटगी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. भाजपचे रामप्प्पा चिवडशेट्टी यांचे पॅनल विजयी झाले आहे. 15 पैकी 10 जागांवर भाजपचा विजय मिळवला आहे. इथं कॉंग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कॉंग्रेसचे नेते हरीश पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
तर कराड तालुक्यातील पाल ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे सहकार ग्रामविकास पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले आहे. भाजप पुरस्कृत गटाचा विजय झाला आहे.