‘छगन भुजबळ म्हातारे, त्यांना कशाला कोण मारेल’; मनोज जरांगे पाटील
मुंबई | मंत्री छगन भुजबळ यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असणारे पत्र समोर आले आहे. मंत्री भुजबळ यांनी या पत्राविषयी पोलिसांना माहिती दिली आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारणा केली असता, छगन भुजबळांना कोणीही कशाला मारेल, असा सवाल केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्व पोलीस द्या. आम्हालाही अनेकदा धमक्या आल्या पण आम्ही आजपर्यंत पोलिसांना सांगितले नाही. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल? हवं असेल तर सुरक्षेसाठी त्यांना पोलिसांचे कपडे घाला. पण भुजबळ म्हातारे आहेत, त्यांना कोणी मारणार नाही. पुरोगांमी महाराष्ट्रावर म्हाताऱ्या व्यक्तींचा आदर करण्याचे संस्कार आहेत. त्यांना मारण्याची गरज नाही ते असेच जातील.
हेही वाचा – चिखलीत २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारणार!
भुजबळांनी बीडमध्ये आपल्या नातेवाईकाचं हॉटेल मराठा आंदोलकांनी जाळल्याचा बनाव रचला तसाच आता पत्रात बनाव रचला असेल. आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला धमकीचे पत्र द्यायला सांगितले असेल. छगन भुजबळांना रात्री जी स्वप्नं पडतात, तेच ते सकाळी उठून बोलतात, अशी टीका जरांगे पाटलांनी केली.
दोन दिवसांत अधिवेशन बोलावून आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी मी आजपासून उपोषण सुरु करत आहे. या उपोषणादरम्यान मी पाणी पिणार नाही, तसेच उपचारही घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप सरकारने मागे घेतलेले नाहीत. यापूर्वी सरकारने यापेक्षा भयानक गुन्हे मागे घेतले आहेत. मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेतले जात नाहीत? राष्ट्रपती राजवट भल्या पहाटे उठवता येते मग गुन्हे मागे का घेता येत नाहीत? मराठा आरक्षणासाठी पुन्हा माझा जीव पणाला लावण्याची तयारी आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.