मुंबईमध्ये बंदला हिंसक वळण; चेंबूरमध्ये बसवर दगडफेक
मुंबई |नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनआरपी आणि भारत सरकारच्या आर्थिक दिवाळखोरीविरोधात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला मुंबईमध्ये हिंसक वळण आले आहे. चेंबरच्या स्वस्तिक पार्कजवळ बसची तोडफोड करण्यात आली आहे. तर ठाण्यातील तीन हात नाका चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुर्ल्यावरुन चेंबूर आंबेडकर उद्यानाकडे जाणारी ३६२ क्रमांकाची बस थांबवून आंदोलकांना बसची तोडफोड केली. यामध्ये बसचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस उमर्शी बप्पा चौक बस स्थानकावर पोहचली. त्यावेळी एका व्यक्ती चेहऱ्याला रुमाल बांधून बसच्या समोर आला. त्याने बसच्या काचावर वीट फेकून मारली. यामध्ये बसचालक जखमी झाला आहे. बसचालकाच्या दोन्ही हातांमध्ये काचांचे तुकडे घुसले आहेत. त्यांना उपचारासाठी गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदमध्ये महाराष्ट्रातील जवळपास ५० पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.