मान्सून भारतात वेळेत दाखल होण्याचे संकेत काय असतात? यंदाची स्थिती काय? वाचा सविस्तर…

India Monsoon 2026 Update: यंदा भारतात मान्सून वेळेवर दाखल होईल, असा अंदाज अनेक खासगी हवामान संस्थाकडून व्यक्त केला जात आहे. सध्या तामिळनाडू आणि केरळमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची नोंद होत असून दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात अपेक्षेपेक्षा थंड वातावरण नोंदले गेले. नैऋत्य मान्सूनच्या आगमनाचे संकेत आता स्पष्ट होत असून मान्सून भारतात वेळेत दाखल होण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाकडूनही त्यादृष्टीने संकेत देण्यात आले आहेत.
सध्या देशातील बहुतांश भागात पश्चिमी विक्षोभाच्या (वादळाच्या) प्रभावामुळे पावसाची नोंद होत आहे. राज्यातही अनेक भागात पावसाळी हवामान आहे. त्यामुळे सध्या कमाल तापमानात काहीशी घट नोंदली जात असल्याने नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील काही भागात धुळीची वादळे निदर्शनास येत आहेत. उष्ण वातावरणात एकदम बदल होऊन काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीची नोंद होत आहे. या सर्व घटना हवामान संक्रमणाच्या काळात घडत असतात असे मानले जाते.
हेही वाचा – ग्राहकांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात वाढ, आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
तामिळनाडू, केरळ तसेच अंदमान-निकोबार बेटांमध्ये या आधीच मेघगर्जनेसह पावसाची नोंद होत आहे. भारतात मान्सून सर्वप्रथम दाखल होणाऱ्या या भागांमध्ये मान्सूनच्या अपेक्षित आगमनाला आता अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. हवामान विभागाने दक्षिणेकडील अनेक भागात पुढील सात दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मे महिन्यात मान्सून पूर्व वादळे काहीशी तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून हा मान्सून वेळेवर दाखल होण्याचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. ऑस्ट्रेलियाकडूनही हवामानासंदर्भात सकारात्मक संकेत मिळत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने नुकतीच २०२५–२६ चा उत्तर ऑस्ट्रेलियातील पावसाळी हंगाम अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियात पावसाचा प्रभाव कमी झाल्यांनतर तो हळूहळू दक्षिण आशियाकडे सरकत असतो. त्यामुळे मान्सून उत्तरेकडे म्हणजे भारताकडे मार्गक्रमण करू लागतो.
सध्या पावसाचा प्रभाव मालदीव, श्रीलंका आणि पुढे अंदमान-निकोबार बेटांच्या दिशेने सरकत आहे. भारतातील मान्सून प्रवासातील हा पहिला टप्पा मानला जातो. त्यानंतर मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. साधारणपाने १ जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यास १० ते १२ जूनच्या आसपास तो महाराष्ट्रात दाखल होतो.





