‘राज्यातील काही नेते अन् प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात’; अंबादास दानवे

मुंबई : राज्यातील राजकीय नेते व काही वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची चर्चा आहे.. पहलगाम हल्ल्याच्या वेळेस असे ट्रॅपिंग करणारे लोकं केंद्र सरकारने पकडले होते. अशा हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाइल बाहेर गेल्याची माहिती आहे.
राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटना योग्य नसून ब्लॅक मेलिंगच्या घटना सुद्धा समोर आल्या आहे. सर्वात महत्वाचं शासकीय कामकाजात याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. तसेच या हनी ट्रॅपमुळे प्रशासकीय लाभ घेतले जाण्याची शक्यता असल्याने यावर विधान परिषद सभागृहात चर्चा करण्यासाठी अंबादास दानवे यांनी नियम २९१ अन्वये प्रस्ताव मांडला आणि हनी ट्रॅपच्या गंभीर मुद्दयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
हेही वाचा – भारतीय नौदलाची ताकद वाढली; आयएनएस निस्तर ताफ्यात दाखल
मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन होते आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधं निवेदन द्यायला सुद्धा तयार नाही, हे अत्यंत धक्कादायक आहे. असा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी अधिवेशनात उपस्थित केला.
राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची ही उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. हनीट्रॅपसारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन, आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव, या सगळ्यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो, की या राज्यात नेमकं चाललंय काय? राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचं जीवनमान सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असं देखील ते म्हणाले.





