राज्यातील सर्व शाळांतील पटपडताळणी एकाच वेळी

मुंबई : राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची एका विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी करण्यात येणार आहे. संबंधित पडताळणीअंती अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभगांची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्राथमिकचे संचालक शरद गोसावी आणि माध्यमिकचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला आहे.
प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संचमान्यता यू-डायस प्लस प्रणालीतील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे. यू-डायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉगिनमधून विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आलेली आहे. ही माहिती संचमान्यतेसाठी विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांची आहे. केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. यात अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (बीट) व गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – पुढील ३ दिवस राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा इशारा
प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असल्यास, असे विद्यार्थी केंद्रप्रमुखांनी कमी करून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला फेरपडताळणीसाठी वर्ग करावेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पुन:पडताळणी करून व नमूद विद्यार्थ्यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आल्यास, असे विद्यार्थी कमी करावेत आणि संबंधित पडताळणी 15 डिसेंबरपर्यंत अंतिम करावी, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.




