शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, बच्चू कडू मुंबईत येणार

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे. कारण बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शविला आहे. त्यानुसार आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. तर आंदोलकांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि अजित नवले हे बैठकीत सरकारसोबत वाटाघाटी करण्यासाठी उपस्थित राहतील. ही उच्चस्तरीय बैठक असल्याने या बैठकीला मुख्य सचिवांसोबतच विविध विभागातील 30 वरीष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील. त्यामुळे आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बच्चू कडू यांनी दिलेले निवेदन आणि 7 एप्रिल रोजी बच्चू कडुंसोबतच्या बैठकीत केलेल्या निर्णयावरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल.
हेही वाचा – भाजपची रणरागिनी शेतकरी बांधवांच्या मदतीला
सर्व शेतकरी नेते एकत्र आले हे या आंदोलनाचे मोठे यश आहे. आम्ही एकत्र आल्याने शेतकऱ्यांना बळ मिळते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करत नाहीत. आजच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नाही तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. आजच्या बैठकीत कर्जमाफी , पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंदे, 20 टक्के बोनस , हमीभाव याबाबत चर्चा होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
आमचा लहान भाऊ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला जात आहे. त्याने शेतकरी हिताचा आणि कर्जमुक्तीचा निर्णय घेऊनच परत यावे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांचे मोठे बंधू बाळू बाबाजीराव कडू यांनी दिली आहे. आमच्या आईने आधीपासूनच बच्चू कडू यांचा शेतकरी हितासाठीचा लढा पाहून त्याने संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी द्यावं, असं सांगितलं होते. आम्हीही कधीही बच्चू कडू यांना कौटुंबिक जबाबदारी अडकवत नाही. बच्चू कडू यांना आमच्या कुटुंबाने एका प्रकारे शेतकऱ्यांच्या लढासाठीच दिले आहे, असे बाळू कडू यांनी सांगितले.




