“माझ्या हत्येचा कट रचला जातोय”; मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil | मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माचनूर, मंगळवेढा येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केला. तसेच, सरकारने पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू न केल्यास आंदोलनाचा इशाराही पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय, त्यांची पोरं मोठी करायला लागलोय म्हणून मी वैरी झालोय. माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत. आपल्याच जवळच्या लोकांना फोडून त्यांच्याकडून काहीही वदवून घ्यायला लागेलत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
हेही वाचा : दर्शन कॉलनी-बंसल विहारमध्ये चेंबर लाईन कामाचा शुभारंभ
मी हात जोडून तुम्हाला सांगतो, दारुचे व्यसन करु नका. व्यसनापासून लांब राहा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. दारु सोडा. शेतात काम करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
राजकारण करु नका अशा मताचा मी नाही पण, फक्त पंधरा दिवस राजकारण करा. त्यानंतर तुमच्या घराकडे लक्ष द्या. मुलाबाळांना अधिकारी करा. राजकारण पाच वर्षे आहे पण, घरातील पोरं अधिकारी झाल्यास पुढच्या पन्नास वर्षांची चिंता संपेल. कुठं सही करायची कुठं नाही आपल्या हातात असेल, असे जरांगे पाटील म्हणाले.




