कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा जागीच मृत्यू

Kalyan Accident | कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका कुटुंबातील तीन भावंडांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उल्हास नदीवरील पुलावर प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, अपघाताची तीव्रता मोठी असल्याने व्हॅनमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
हेही वाचा : सलग तीन पराभवांनी मुंबई इंडियन्स अडचणीत; प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार? वाचा समीकरण
या व्हॅनमधून एकूण ११ प्रवासी प्रवास करत होते. मृतांपैकी ९ जणांची ओळख पटली असून त्यामध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. उर्वरित दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मृतदेह गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. ओळख पटलेल्या मृतांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला असून रुग्णालय परिसरात नातेवाईकांची गर्दी होऊ लागली आहे.
दरम्यान, या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे तिघेही १७ ते २२ वर्षे वयोगटातील असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.





