राज्यात उष्णतेचा कहर! अकोल्यात 46 अंशांचा इशारा, उष्माघाताने परभणीत मृत्यूची घटना, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

मुंबई : राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसत आहेत. अकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत अकोल्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक ठरत आहे.
21 एप्रिल : 43.6
22 एप्रिल : 43.7
23 एप्रिल : 44.3
24 एप्रिल : 45.0
25 एप्रिल : 45.6
हेही वाचा – उत्तम आरोग्यासाठी ‘आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालया’पर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन!
परभणीत 37 वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगाव शहरात तापमान 43 अंशांच्या पुढे गेल्याने महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. एप्रिल महिन्यातच मुंबईचा पारा 39 अंश सेल्सिअस वर पोहचला आहे. हवामान विभागाकडून खरंतर रविवारी आणि सोमवारी मुंबई शहरात आणि मुंबईच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. यानंतर आज मुंबईत चक्क पारा 39 अंश सेल्सियस वर पोहोचला आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी घरी राहण्यास पसंती दिली आहे.
देशातील वीज मागणीचा उच्चांक नोंदवला गेलाय. एप्रिल महिन्यात विजेच्या मागणीने 240 गिगावॉटचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी जून महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी 242.77 गिगावॉट इतकी नोंदवली गेली. वाढती उष्णता आणि एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेल्या हीटवेव्हमुळे देशभरात विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
उन्हाळी हंगामातली आतापर्यंतही ही सर्वोच्च पातळी आहे. कमाल तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसच्यादरम्यान असल्याने आणि उष्णतेच्या लाटांचा प्रभाव असल्यामुळे AC, कुलर्स आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी क्षेत्रात पंप संचांचा वापर वाढल्यामुळेही विजेचा खप वाढला आहे. उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी अंदाजे 270 गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज विद्युत विभागाने वर्तवला आहे.





