सरकारचा मोठा निर्णय! Sanchar Saathi ॲप प्री-इंस्टॉलेशन आदेश मागे, या कारणामुळे दूरसंचार विभागाचा ‘यू-टर्न’

नवी दिल्ली: स्मार्टफोनवर ‘संचार साथी’ ॲप प्री-इंस्टॉल करण्याचा केंद्र सरकारने दिलेला आदेश अखेर मागे घेतला आहे. ॲप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सच्या संख्येत अचानक झालेल्या अनपेक्षित वाढीमुळे दूरसंचार विभागाने (DoT) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
बुधवारी ही घोषणा करण्यात आली. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ एका दिवसात सहा लाखांहून अधिक नागरिकांनी हे ॲप स्वतःहून डाऊनलोड केले, ज्यामुळे ॲपच्या वापरात तब्बल दहा पटीने वाढ झाली. यामुळे, आता मोबाईल कंपन्यांना नवीन स्मार्टफोन्समध्ये हे ॲप आधीपासून इंस्टॉल करण्याची गरज राहणार नाही.
आदेश वापसीमागील कारण
दूरसंचार विभागाने २८ नोव्हेंबर रोजी आदेश जारी करत सर्व नवीन स्मार्टफोन्सवर ‘संचार साथी’ ॲप प्री-इंस्टॉल करण्याचे आणि जुन्या डिव्हाईसवर ते अपडेट करण्याचे निर्देश दिले होते.
या आदेशावरून मोठा विवाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याला नागरिकांच्या खाजगीपणासाठी धोका असल्याचे म्हटले होते. ॲपमुळे कॉल ऐकले जाऊ शकतात किंवा मेसेजचे निरीक्षण केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, DoT ने स्पष्टीकरण दिले होते की, ॲपला केवळ मर्यादित डेटापर्यंतच प्रवेश असेल आणि तोही फक्त तेव्हाच, जेव्हा युजर स्वतः फसवणूक किंवा घोटाळ्याची तक्रार करेल.
हेही वाचा – ‘ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाचा प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
युजर डेटा आणि सुरक्षितता
दूरसंचार विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की ‘संचार साथी’ ॲप कोणत्याही वेळी युजरचे संपर्क (कॉन्टॅक्ट्स), लोकेशन, मायक्रोफोन किंवा इतर कोणतीही खाजगी माहिती ॲक्सेस करत नाही.
फसवणुकीचे कॉल/मेसेजचा स्क्रीनशॉट किंवा IMEI चा फोटो पाठवण्यासाठी, तसेच OTP व्हेरिफिकेशनसाठी ॲप केवळ फोन कॉल, SMS आणि कॅमेऱ्याची मर्यादित परवानगी घेते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युजर्स कोणत्याही वेळी ही परवानगी परत घेऊ शकतात, मोबाईल नंबर डी-रजिस्टर करू शकतात किंवा ॲप अनइंस्टॉल करू शकतात.




