डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा
मेलघाटमधील दोन रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी

महाराष्ट्र : दरवर्षी 1 जुलै रोजी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या समरणार्थ भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस पांढऱ्या कोट मधल्या हिरोंच्या समर्पणाचा, निस्वार्थ सेवेचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
पण हे सगळेच हिरो पांढरे कोट घालततात असं नाही. आपल्या महाराष्ट्रात असंच एक मराठमोळं दाम्पत्य आहे जे हा पांढरा कोट तर घालत नाहीतच, पण त्याचसोबत फक्त 2 रुपयात सगळ्या रुग्णांचा उपचार करतात.
हे जोडपं म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे. ज्यांनी शहरातील ऐषोआरामाचं जीवन सोडून ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्यसेवेचा वसा घेतला आहे. गेल्या तीन दशकांपेक्षाही जास्त काळापासून हे जोडपं महाराष्ट्राच्या मेळघाटातील आदिवासी पट्ट्यातील बैरागड या लहानश्या गावात केवळ दोन रुपयांत रुग्णांची तपासणी करत आहेत. डॉक्टर्स डे निमित्त जाणून घेऊया यांची प्रेरणदायी कहाणी.
हेही वाचा : विधानसभेत गोंधळ! काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं एका दिवसासाठी निलंबन
“एक रुपये वाले डॉक्टर” म्हणून देशभरात प्रसिद्ध
डॉ. कोल्हे यांना संपूर्ण देशात ‘एक रुपयाचे डॉक्टर’ म्हणून ओळखलं जातं. कारण त्यांच्या कन्सल्टेशनची फी फक्त दोन रुपये आणि फॉलोअपसाठी फक्त एक रुपये एवढीच फी आहे. पण त्यांचे काम एवढ्या पुरतेच मर्यादित नसून त्यांनी मेळघाटातील भागात आरोग्य, पोषण, शिक्षण आणि शेती अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठं काम केलं आहे.
गावकऱ्यांसाठी जीवन समर्पित
1985 साली डॉ. रवींद्र कोल्हे यांनी नागपूरमधून MBBS चं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनतर मेळघाटात जायचं ठरवलं. परंतु रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे बैरागड इथे पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल 40 किलोमीटर चालत जावे लागले. पण इथली गरिबी आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे त्यांनी हे ठिकाण आपली कार्यक्षेत्र बनवायचं ठरवलं.
काही वर्षांनी त्यांनी एमडी MD (Preventive and Social Medicine)ची पदवी घेतली आणि पुन्हा पत्नी स्मितासह बैरागडला परतले, ज्या स्वतः एक होमिओपॅथ आणि योग थेरपिस्ट आहेत. तिथून पुढे त्या दोघांनी मिळून गावकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आरोग्यसेवा सुरु केली.