#Lockdown: टाळेबंदीत घरगुती हिंसाचार वाढल्याचा दावा खोटा- स्मृती इराणी
करोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात घरगुती हिंसाचार वाढल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी फेटाळून लावला आहे. करोना काळातील टाळेबंदीत घरगुती हिंसाचार वाढला होता, त्या वेळी निर्बंध असल्याने महिलांना तक्रारी नोंदवता आल्या नाहीत, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले, घरगुती हिंसाचार वाढला होता हा दावा चुकीचा आहे. शिवाय प्रत्येक राज्यात पोलीस खाते सजगतेने काम करीत होते. प्रत्येक राज्यात घरगुती हिंसाचाराविरोधात तक्रारी करण्यासाठी एकल केंद्रे आहेत. सरकारने अनेक महिलांची अशा काही घटना घडल्या असतील तर त्यातून सुटका केली आहे. राज्याराज्यात, जिल्हानिहाय आम्ही प्रत्येक महिलेला कशी मदत केली याचा तपशील माझ्याकडे आहे.
महिला व बालविकासमंत्री असलेल्या इराणी यांनी सांगितले, की विकासाच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या स्वयंसेवी संस्थांनी जगात व भारतातही याबाबत भीती पेरली. टाळेबंदी काळात ८० टक्के महिला घरात होत्या. भारतात प्रत्येक पुरुष बायकांना मारतो असे म्हणणे चुकीचे आहे. आमचे पोलीस कार्यक्षमतेने काम करीत होते. टाळेबंदीमुळे पोलीस खाते बंद ठेवलेले नव्हते. आमची समस्या निवारण केंद्रे टाळेबंदीतही चालू होती. या सुविधा केवळ महिलांनाच नव्हे तर मुलांनाही उपलब्ध होत्या. सर्व राज्यात एकूण ३५ हेल्पलाइन क्रमांक आहेत. याशिवाय केंद्राचा हेल्पलाइन क्रमांक वेगळा आहे. या सुविधा सुरू होत्या.