JNU मध्ये पुन्हा हिंसाचार; विद्यार्थी संघटना आमने-सामने, अनेक विद्यार्थी जखमी

JNU | दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात जोरदार संघर्ष झाला. दगडफेकीत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)ने या घटनेला विद्यार्थी चळवळीवरील मोठा हल्ला म्हटले आहे. एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी जेएनयूएसयूच्या छावणीवर दगडफेक करून निःशस्त्र विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. तर, एबीव्हीपीने ही “दहशतीची रात्र” असल्याचे म्हणत ३०० ते ४०० मुखवटा घातलेले लोक कॅम्पसमध्ये हिंसाचार करत असल्याचा दावा केला.
हेही वाचा : ‘माजी लष्करप्रमुखांना पुस्तके लिहिण्यास बंदी नाही’; राजनाथ सिंह यांनी केले स्पष्ट
जेएनयू विद्यार्थी संघटनेने रविवारी रात्री साबरमती ढाबा ते पूर्व गेटपर्यंत मोर्चाचे आवाहन केले होते. कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चादरम्यान दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणाव वाढला.
डाव्या संघटनांनी प्रशासनावर अभाविपला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे, तर अभाविपने हे आरोप फेटाळत डाव्या संघटनांनीच हिंसाचार भडकवल्याचा दावा केला. घटनेनंतर कॅम्पसमध्ये तणावपूर्ण शांतता असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




