आधी भारतीयांना लस द्या, मग जगभर वाटा – इम्तियाज जलील
नवी दिल्ली – भारतात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सोबतच सरकारकडून लसीकरणाचा वेग देखील वाढविण्यात आला आहे. भारताकडून जगातील अनेक देशांना लसीचा पुरवठा केला जात आहे. मात्र आधी भारतातील नागरिकांना लस द्यावी व त्यानंतर जगभरात पाठवावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत ही मागणी उचलून धरली.
वाचा :-देशात कोरोनाचा विस्फोट, २४ तासांत सापडले ३९ हजार ७२६ नवे रुग्ण
लोकसभेत बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, आपण जगभरात 72 देशांना कोरोना लस वाटत असल्याचा दावा करत आहात. पण सध्या भारतीयांना लशीची सर्वात जास्त गरज आहे. लोक रांगेत उभे आहे. त्यामुळे आधी भारतातील लोकांना कोरोना लस द्या, त्यानंतरच जगभरात वाटा.
आपण इतरांचीही मदत केली पाहिजे. तुम्ही 72 देशांना लस पोहोचवत असल्याचा दावा करत आहात. हे केलंच पाहिजे, ही भारताची संस्कृतीच आहे. पण त्याआधी सगळ्या भारतीयांचं लसीकरण झालं पाहिजे. प्रत्येक भारतीयाचं लसीकरण जेव्हा पूर्ण होईल, तेव्हाच जगभरात त्याचं वाटप करावं, असे जलील म्हणाले.
आपल्याकडे लोकांना लस मिळत नाहीये, आणि तुम्ही जगभरात पोहचवत असल्याचा दावा कसा करता ? असा सवाल देखील जलील यांनी मोदी सरकारला विचारला.





