देशात कोरोनाचा विस्फोट, २४ तासांत सापडले ३९ हजार ७२६ नवे रुग्ण
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशात शुक्रवारचीही आकडेवारी समोर आली असून रुग्णसंख्येनं 110 दिवसातील सर्वात मोठा आकडा गाठला आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे नवे 39,726 रुग्ण आढळले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारच्या तुलनेत मृतांच्या संख्येत घट आली आहे. शुक्रवारी 154 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
याआधी २९ नोव्हेंबरला देशात 41,810 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर हा आकडा खाली येताना दिसत असल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येचा आलेख वर जाताना दिसत असल्यानं पुन्हा एकदा सर्वांचीच चिंता वाढली आहे. शुक्रवारी नवीन रुग्णसंख्येचा आकडा पाहाता लवकरच नोव्हेंबरची हीआकडेवारीही पार होईल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असला तरी मृत्यूदर कमी राखण्यात भारताला यश आलं आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.३८ टक्के इतका आहे.
याशिवाय राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यान वाढत आहे. त्यातही नागपूरमध्येही कोरोनाचा कहर वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही नागपुरात रुग्णसंख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी 24 तासात नागपुरात 3235 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा चिंता वाढवणारा आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनातून बरे झालेल्या ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सहा महिन्यांनंतर पुन्हा या संसर्गाची बाधा होण्याचा मोठा धोका आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. त्यामुळे, कोरोनाचं संकट अजूनही कायमच आहे.