ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

धमक्या झाल्या, इशारे झाले, आता, युद्ध उंबरठ्यावर आले!

केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी सात मे रोजी ‘मॉक ड्रिल’ चा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाकिस्तान विरोधातील युद्ध सुरू झाले, तर युद्धजन्य परिस्थिती कशी असते ? हे नागरिकांना समजावे यासाठी या ड्रिलचे प्रयोजन करण्यात आले आहे.

बेजबाबदार देशद्रोही नेते ..

नव्या पिढ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे. एकीकडे, पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी करताना केंद्र सरकारची फजिती झाली तर हवीच असणारा एक मोठा वर्ग, काही राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रवक्ते देशात आहेत. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली असली तरी अजय राय यासारखे अत्यंत बेजबाबदार नेते काँग्रेस पक्षात आहेत. दुसरीकडे इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, वगैरे गोष्टी गौरवाने सांगताना बांगलादेश निर्मितीचे साईड इफेक्ट आपण भोगत आहोत ,आणि त्या काळात आलेले लाखो बांगलादेशी भारताचे नागरिक झाले होते, त्याचे परिणाम देखील आपण भोगत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे!

काहींना पूर्वीचे युद्ध आठवेल..

भारताच्या संरक्षण क्षेत्रावर अधिकार वाणीने लिहिण्याएवढा तज्ज्ञ मी नक्कीच नाही. घरात एसी मध्ये बसायचे आणि जगाला सल्ला द्यायचा, हा धंदा करायला, मी उबाठा गटाचा प्रवक्ता तर नक्कीच नाही !त्यामुळे, अजून पाकिस्तानात भारतीय लष्कर कसे घुसले नाही, असे फालतू प्रश्न मी विचारणार नाही. सरकारने युद्धजन्य परिस्थितीत जनतेची भूमिका काय असावी, याचा सखोल विचार केलेला आहे. आज सत्तरी ओलांडलेल्या लोकांना १९६५ चे युद्ध आठवत असेल. त्या वेळी सकाळी दहा वाजता भोंगा वाजायचा, तो युद्धाचा इशारा असायचा. शाळेत मुले मुली सुरक्षित ठिकाणी लपायची. त्या काळात देखील शत्रू आपल्या जवळपास कुठेतरी लपलेला असायचा. आज परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. उलट लोकसंख्या वाढलेली असल्याने शत्रूला लपण्यासाठी जागा अधिक आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !

आर्थिकदृष्ट्या भारत बळकट..

आर्थिक पातळीवर भारताची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. म्हणजे, खजिन्यात बऱ्यापैकी पैसा आणि सोन्याचा प्रचंड साठा आहे. तरीही युद्ध करुन यातील संपत्ती कमी करायची किंवा कसे याचा सरकारला विचार करावा लागतो, म्हणून पाकिस्तानच्या विरोधात करण्याच्या कारवाईची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल. इस्राईल किंवा रशिया जसे हल्ले करतात आणि महिनोन्महिने युद्ध खेळत बसतात, तसे भारतीय नेतृत्व अजिबात करणार नाही, याची खात्री आहे. फक्त शत्रूला जेरीस आणण्याचे जोरदार उपाय करण्यात आले आहेत. भारताने युद्धात उतरावे आणि त्यात उभय बाजूंची हानी व्हावी, हीच जगातील अनेक देशांची भूमिका आहे. चीनबरोबर सध्या थोडीफार मैत्री झाली आहे, असे दिसत असले तरी चीन हा उलटणारा देश आहे. पाकिस्तान दळभद्री आहे. पण, असे युद्ध वगैरे झाले तर कुरापती काढण्याची संधी चीन नक्कीच सोडणार नाही. पण युद्धात जेवढी हानी होणार नाही, त्यापेक्षा अधिक हानी पाकिस्तानची केवळ युद्धजन्य परिस्थिती असल्याने झाली आहे आणि होत आहे, याचा साधारण अंदाज आला आहे. युद्धात नुकसान झाले आणि अन्नान्न दशा झाली की जगभरात भीक मागायला पाकिस्तान मोकळा आहे. भारतावर अशी नक्कीच वेळ येणार नाही !

हेही वाचा   :    Operation Sindoor । ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष!

सुरक्षा यंत्रणेच्या पाठीशी उभे राहा..

या सर्व पार्श्वभूमीवर, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक संपन्नता प्राप्त झालेला मोठा वर्ग आहे. या वर्गाला आपले आर्थिक हितसंबंध बिघडणे परवडणारे नाही. तरीही देशभक्ती मनात असेल तेव्हा हे हितसंबंध बाजूला ठेवले जातात. युद्ध करायचे असेल, तेव्हा सीमेवर असलेल्या जवान आणि अधिकारी यांना करावे लागते. एक अधिकारी किंवा एक सैनिक घडवणे, हे साधे काम नाही, तब्येतीने दणदणीत असलेले हे लोक असतात. ते शेतात राबले तरी उत्पन्न दुप्पट काढण्याची क्षमता असते. एखाद्या वसाहतीत चार जवान राहात असतील तर सगळ्यांना सुरक्षित असल्यासारखे वाटते. एक निवृत्त जवान गावात राहायला आला तर गावाला नवा मार्ग दाखवतो. अशा जवानांच्या पाठीशी उभे राहाणे हे जनसामान्यांचे कर्तव्य असते. टोपीवर लाल तुरा असलेला जवान बघितला, तरी आपल्याला सुखावह वाटते. अशा संरक्षण क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी ‘सिक्युरिटी ड्रिल’ असते. सरकारच्या प्रयत्नांना आपण साथ देऊ या.

अभ्यासू पंतप्रधान, हे आपले सुदैव !

आपल्या देशाला एक अभ्यासू आणि दूरदृष्टीचा पंतप्रधान मिळाला आहे हे आपले खरोखर सुदैव म्हणावे लागेल. रोज अनेक अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा, होणाऱ्या संभाव्य युद्धाचे नियोजन, देशवासीयांची सुरक्षा, आणि कोणत्याही परिस्थितीत अडचणीत न येण्यासाठी केलेले डावपेच आपण रोजच पाहत आहोत, अनुभवत आहोत. पाकिस्तानचे निम्मे मंत्री देशातून पळून गेले आहेत, नागरिकांना अक्षरशः वार्‍यावर सोडून गायब झाले आहेत ! युद्धाच्या वेळी असले बेजबाबदार अधिकारी काय कामाचे ?

देशद्रोह्यांना चाप बसवा..

एकीकडे केंद्रातील सत्ताधारी सरकारच्या पाठीशी आपण आहोत, असे सांगणारे याच सरकारवर अत्यंत खालच्या थरावर जाऊन टीका करत आहेत, हे जास्त क्लेशदायक आहे. जी काही बुद्धी आहे ती केंद्र सरकारच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी आहे, असे काहींचे म्हणणे आहे किंवा समज आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या काळात आणि शत्रू उंबरठ्यावर येऊन थांबलेला असताना अशा देशद्रोही मंडळींना चाप लावणे गरजेचे आहे, बघू या त्यासाठी केंद्रातील मोदी सरकार काही पावले उचलणार का ? एक गोष्ट नक्की आहे की बाहेरच्या उघड शत्रूपेक्षा घरातले छुपे शत्रू जास्त धोकादायक असतात हे नक्की !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button