वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग XI कशी असेल? ‘या’ 3 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता

ICC T20 World Cup 2028: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत T20 क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर मोठा भर दिला आहे. अशातच 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या ICC T20 World Cup कडे पाहता टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चांना उधाण आले आहे. वेगवान, स्विंग आणि बाऊन्स असलेल्या खेळपट्ट्यांवर दमदार कामगिरी करणारा संघ तयार करण्याचे आव्हान भारतासमोर असेल.
भारताला 2007, 2024 आणि 2026 नंतर चौथ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्याची संधी असणार आहे. मात्र, त्यासाठी संघ व्यवस्थापनाला अनुभव आणि युवा ताकदीचा योग्य मेळ साधावा लागणार आहे.
भारताचे टॉप युवा फलंदाज
2028 च्या T20 World Cup मध्ये युवा फलंदाज ईशान किशन संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सलामीला आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा आणि युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशीची जोडी मैदानात उतरू शकते. तर अनुभवी संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाला स्थैर्य देऊ शकतो.
मिडल ऑर्डरमध्ये ताकद
कर्णधार म्हणून ईशान किशन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तर तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. याशिवाय हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे अष्टपैलू खेळाडू संघाला फलंदाजीसह गोलंदाजीतही बळ देतील. खालच्या फळीत जलद धावा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असू शकते.
हेही वाचा – Health and Fitness : फिट राहायचंय? आजच बदला या ५ सवयी!
स्पिन आणि वेगवान गोलंदाज
स्पिन आक्रमणात वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. सुंदर फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. तर वेगवान गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह सांभाळण्याची शक्यता आहे. त्याला साथ देण्यासाठी अर्शदीप सिंह संघात असू शकतो. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
संभाव्य Playing XI
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.
‘या’ 3 स्टार खेळाडूंना बसू शकतो फटका?
स्पर्धा वाढत असल्याने सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह आणि अक्षर पटेल यांना 2028 च्या T20 World Cup संघात स्थान मिळणं कठीण जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. मात्र, पुढील दोन वर्षांतील फॉर्म, फिटनेस आणि कामगिरी यावर अंतिम चित्र अवलंबून असेल. क्रिकेटमध्ये एका मालिकेनंतर चित्र बदलतं, त्यामुळे 2028 पर्यंत अनेक नवे चेहरेही समोर येऊ शकतात.





