जावलीतील बहुचर्चीत हुमगाव- बावधन रस्त्याची दर्जोन्नती
मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी दिली मंजूरी; दोन तालुके जोडून दळणवळण सुकर होण्यास मिळणार

कुडाळ | सातारा जिल्ह्यातील जावली आणि वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आखाडे- हुमगाव- वाघजाईवाडी- झगडेवस्ती- बावधन बगाड या महत्त्वाच्या मार्गाची दर्जोन्नती करून त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे जावली तसेच वाई तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुकर, सुलभ आणि सुरक्षित होण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या प्रस्तावानुसार तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या ठरावानुसार सदर मार्गाच्या दर्जोन्नतीचा सविस्तर विचार करून या रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली आहे. या मार्गावरील वाढती वाहतूक, परिसरातील गावांची संख्या आणि लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी घेतला. शासन निर्णयानुसार आखाडे-हुमगाव-वाघजाईवाडी-झगडेवस्ती-बावधन बगाड रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 181 असा क्रमांक देण्यात आला आहे. या मार्गाची एकूण लांबी 12.800 कि. मी. असून जावळी आणि वाई तालुक्यातील अनेक गावांना या मार्गामुळे थेट लाभ मिळणार आहे या ग्रामीण रस्त्याला आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्ती, मजबुतीकरण आणि विस्ताराच्या कामांना गती मिळणार आहे.
हेही वाचा : MIT Arts, Commerce and Science College मध्ये ‘कोड अँड क्रिएट’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून येथील शेतीमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास तसेच दैनंदिन दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर असल्याची खात्री करूनच पुढील विकासकामे करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करण्याच्यादृष्टीने शासनाने घेतलेला हा निर्णय स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळेल, तसेच जावली-वाई परिसरातील दुर्गम वस्त्यांचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारल्यास पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाला बळ..
प्रमुख जिल्हा मार्गांच्या लांबीत वाढ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयानुसार या दर्जोन्नतीमुळे सातारा जिल्ह्यातील प्रमुख जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांची एकूण लांबी 4050.745 कि.मी. इतकी झाली आहे. ग्रामीण मार्गांची लांबी 64.80.135 कि.मी. इतकी राहणार आहे.आखाडे-हुमगाव-वाघजाईवाडी-झगडेवस्ती -बावधन बगाड या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे जावली व वाई तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला नवे बळ मिळेल. या मार्गाच्या दर्जोन्नतीमुळे नगारिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करणे आणि दुर्गम भागांना मुख्य प्रवाहाशी जोडणे हे शासनाचे प्राधान्य आहे. या मार्गाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे करण्यात येतील. या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.




